Maharashtra Board Class 7 Marathi लेखन विभाग (रचना)

Students can find the best Marathi Balbharati Class 7 Solutions and Class 7 Marathi लेखन विभाग (रचना) for exam preparation.

Maharashtra Board Class 7 Marathi लेखन विभाग (रचना)

१. निबंधलेखन

लेखनकला विकसित करणे हा भाषा शिक्षणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. लेखन कौशल्यामुळे आपल्या मनातील विचार सुसंगतपणे लिहिण्याची सवय लागते. लेखन प्रकारांमध्ये निसर्गाचे वर्णन करणे, व्यक्ती किंवा प्रसंगाचे चित्रण करणे, दिलेल्या कल्पनांचा विस्तार करणे, एखादया विषयावर वैचारिक लेखन करणे, आपल्या अनुभवांचे कथन करणे अशा गोष्टींचा समावेश होतो. आपल्याला सुचणाऱ्या विचारांमधून सुयोग्य व आवश्यक विचार निवडून ते सुसंगतपणे मांडता येण्यासाठी लेखनकौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. वाचनाची आवड, शब्दकोशाचा वापर यांमुळे लेखनात सहजता येते. उदाहरणादाखल खालील विषयांवरील लेखन पाहा.

१. अंकच नसते, तर…

आज निकालाचा दिवस. सगळ्या विषयांत चांगले गुण मिळणार हे निश्चित आहे; मात्र ‘गणित’ म्हटलं, की माझ्या मनात धडकीच भरते. त्यातील अंत माझ्या डोळ्यांसमोर भिरभिरू लागतात. पाढे म्हटले, की माझी मती खुंटल्यासारखी होते. अशा गणितात कमी गुण असणार हे निश्चित. ‘एक होता खेकडा, चालायचा वाकडा, गणिताशी त्याचा छत्तीसचा आकडा’ या लहानपणीच्या कवितेतील खेकडा मीच असल्याची जाणीव मला होऊ लागली होती. अशाच द्विधा मनस्थितीत मनात विचार आला, की हे अंकच नसते, तर……

अंकच नसते, तर गणित विषय नसता. मग वर्गातील माझा पहिला क्रमांक निश्चित असता. रोज अंकांशी चाललेले युद्ध कधी सुरूच झाले नसते. शाळेत दळवी सरांच्या रूपात आम्हांला गणिताची भयानकता अनुभवता आली नसती. मुळात वर्गात समोर उभे राहून पाढे बोलण्याची पाळी माझ्यावर आलीच नसती. परिणामी, माझे धम्मक लाडूही वाचले असते. गणितातील माझी ही अवस्था पाहून आई हा विषय बाबांच्या हातात सोपवते. त्यांच्याजवळ अभ्यासाला बसण्याच्या कल्पनेनेच घाबरणारा मी, त्यांच्याबरोबर गणिताशी कसा लढणार होतो? हे अंक नसते, तर बाबांचा राग आणि मिळणारे धपाटेही वाचले असते. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पदावल्या, शेकडेवारी सारे सारे काही अस्तित्वातच आल नसते. अंकच नसते, तर ‘आर्यभट्टाचा’ शून्यही नसता. परिणामी, मोजमापाची चिंताच नसती. शाळेत मग माझीच सत्ता असती.

पण, जर अंक नसते, तर व्यवहार कसा चालला असता. काही मोजता आले नसते. सेकंद, मिनिट, तास, दिवस, वर्षे, महिने कशाचेच भान राहिले नसते. पैसे तर अस्तित्वातच नसते. मग खरेदी-विक्री कशी केली असती. बँका तर अस्तित्वातच आल्या नसत्या. चलनाअभावी साऱ्याचाच गुंता झाला असता. मग खाऊसाठी पैसेच मिळाले नसते. अंक आपल्या जगण्याचा एक भाग झाले आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या अंकांच्या मदतीची आपल्याला गरज असते. सकाळी किती वाजता उठायचे हे अंकांवरूनच लक्षात येते. पोळ्या किती खायच्या, पाणी किती प्यायचं, टिव्ही कधी लावायचा, शाळेत कधी जायचं, शाळेत किती मुलं, किती पुस्तकं, अशा किती प्रश्नांची उत्तरेच सापडली नसती. मोठमोठे गणिततज्ज्ञ निर्माण झालेच नसते. परिणामी, कोणतेही शोध लागले नसते.

आज मानव चंद्रावर जाऊन आला, मंगळावरही त्याने पाऊल ठेवले, आज भारताने तर १०४ उपग्रहही अवकाशात सोडले. या साऱ्या संशोधनात महत्त्वाचे ठरतात ते हे अंक. जर हे अंक नसते, तर आजही आपण अश्मयुगातील माणसाचे आयुष्य जगत असतो. साऱ्या आयुष्याचे गुणोत्तरच बिघडले असते. अंकांशिवाय वेळेचे भान नसते, त्यामुळे नियोजन झाले नसते आणि या साऱ्यावाचून आयुष्याची गाडी पुढे सरकलीच नसती. आज विज्ञानातील विविध प्रकारच्या शोधांनी मानवी जीवन सुखकर बनवले आहे. यांत्रिकीकरणाने तर मानवाला समृद्ध बनवले आहे; मात्र हे सारे शक्य झाले या अंकामुळेच.

‘शून्याचे’ वरदान देणाऱ्या त्या आर्यभट्टाला धन्यवाद दयावेसे वाटतात. त्याच्या त्या देणगीमुळेच आज जगाला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करता आली. आज ज्या सर्व क्षेत्रांत मानव आपले अस्तित्व सिद्ध करू शकला आहे ते या अंकांच्या बळावरच, त्यामुळे प्रत्येकाने या अंकांचे बोट धरून प्रगतीचे शिखर गाठणे काळाची गरज बनली आहे. आपलं जीवन हे अंकमय झाल्याचे आपण सर्वांनीच मान्य केले पाहिजे, त्यामुळेच आजपासून या अंकांची भीती न बाळगता त्यांच्याशी मैत्री करणे हेच शहाणपणाचे ठरेल,

पाढेपाठांतराला न घाबरता या गणिताशी, या अंकांशी आजपासून मी गट्टी करणार आहे, हे निश्चित.

२. आई संपावर गेली, तर…

नुकताच पावसाळा सुरू होत होता. शाळाही आम्हां मुलांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या होत्या. शाळेचा पहिला दिवस म्हणून साऱ्या नव्या वस्तूंसह नव्या जोमाने शाळेत जायला निघालो. रस्त्यावर गेल्यावर प्रचंड गर्दी पाहून काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. पुढे गेल्यावर रिक्षांचा संप असल्याचे कळले, त्यामुळे त्या लवाजम्यासह घरी रवानगी झाली. घरी टीव्ही लावला तर त्यावर शेतकऱ्यांच्या संपाची बातमी. किती हे संप.. अचानक मनात विचार आला, या सगळ्या संपांचे तर ठीक.. पण आई संपावर गेली, तर…!

रोज सूर्य उगवण्यापूर्वी ती उठते आणि कामास सुरुवात करते व सूर्यास्तानंतरही तिची कामे चालूच असतात. तीच संपावर गेली तर कदाचित हा सूर्यही उगवणार नाही. घरातल्या प्रत्येकाची ती जणू ताकदच आहे. ती अशी ‘वर्किंग वुमन’ आहे जिला महिन्याचा पगार नसतो, कोणत्याही प्रकारची रजा नसते, कोणत्याही दिवशी सुट्टी नसते, उलट सुट्टीच्या दिवशी तिची डबल ड्युटी लागते. अशी आई संपावर गेली, तर माझे तर विश्वच थांबून जाईल.

माझा दिवस सुरू होतो आईमुळे आणि संपतो तोही तिच्या सोबतच. मुळात तिचे विश्वच मी आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे; मात्र माझेही विश्व तिच आहे हे मला कधी लक्षातच आले नाही. माझा आपला सततचा हट्ट, तिच्याशी भांडणं, तिला जणू मी गृहीतच धरले आहे. माझ्या प्रत्येक गोष्टीत मला तिची मदत हवी असते आणि कोणत्याही अपेक्षेविना ती हे करते. यामागे तिचा कोणताही स्वार्थ नसतो.

‘आई’ या शब्दाची फोड केली, तर ‘आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर ! आज विचार केला तेव्हा लक्षात आले, की परमेश्वराला सगळीकडे जाता आले नाही, म्हणून त्याने आईची निर्मिती केली. तिच्या रूपाने आज परमेश्वरच आपल्यासोबत असल्याची जाणीव झाली.

माझे अनेक मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, सखे सोबती आहेत. माझ्या आनंदाच्या वेळी ते सर्व सोबत असतात; मात्र जेव्हा मी दुःखी असतो, मला त्रास होत असतो तेव्हा माझ्या सोबत फक्त माझी आई असते. यानंतरही संपूर्ण जग जरी माझ्या विरोधात उभे राहिले तरी माझ्यामागे माझी आई नक्कीच उभी असेल असा ठाम विश्वास मला आहे.

माझं सारं काही आवरण्यापासून, शाळेत नेण्यापासून, रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कामात आई मदतीला असते. कधी कधी वैतागून का सारखी मागे लागतेस ? म्हणून मी रागही करतो. तिचे ते सारखे अवतीभवती राहणे त्रासदायक वाटते; पण तिच्या संपावर जाण्याची कल्पना केली की, तिच्या अस्तित्वाचे महत्त्व लक्षात येते.

आईचे आपल्यासोबत असणेच मनातील सारी भीती गायब करते. ती सोबत असते तेव्हा या जगाची पर्वा नसते; मात्र ती संपावर गेली, तर मी एकटा पडेन. माझी कामे कोण करेल, माझे सारे आवरून कोण देईल, माझी काळजी कोण करेल, मला शाळेसाठी तयार कोण करेल हे सारे क्षुल्लक झाले; पण माझा सूर्यच कसा उगवेल ? माझा सूर्य तर तीच आहे ना !
आईचे महत्त्व कवी यशवंतांच्या कवितेतील दोन ओळींमधून व्यक्त होते,

“स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी ।।”

खरंच आईच्या संपाची कल्पनाच करवत नाही. या साऱ्या जगाला चालवणारे ते इंजीन थांबले, तर सारंच खोळंबेल. हा भयानक विचार इथेच झटकलेला बरा; पण आईला संपावर जावे लागणारच नाही असे मी यापुढे वागायचे ठरवले आहे.

Maharashtra Board Class 7 Marathi लेखन विभाग (रचना)

३. माझे आवडते पुस्तक

नव्या शाळेत दाखल झाल्यावर पहिल्याच दिवशी आम्हांला आमच्या आवडी-निवडींविषयी काही प्रश्न विचारले गेले. त्यावेळी माझ्यासमोर एकच नाव आले ते म्हणजे ‘श्यामची आई’ मागच्या वर्षी माझ्या वाढदिवसाला मला मित्र – मैत्रिणींकडून, नातेवाईकांकडून, शेजाऱ्यांकडून खूप भेटवस्तू मिळाल्या; मात्र सर्वांत विशेष भेट मला माझ्या आई-बाबांनी दिली, ती भेट म्हणजे साने गुरुजींनी लिहिलेले ‘श्यामची आई’ हे पुस्तक.

‘श्यामची आई’ हातात पडल्यावर मी थोडी नाराजच झाले होते. आई-बाबांनी भेट म्हणून पुस्तक का दिले असा प्रश्न मला पडला; पण जेव्हा मी ते पुस्तक वाचायला प्रारंभ केला त्यावेळेस त्या अमूल्य वस्तूचे मोल माझ्या ध्यानात आले.

‘श्यामची आई’ हे निव्वळ एक पुस्तक नाही, तर तो जगण्याचा मार्ग आहे हे वाचल्यावर कळते. माझ्या बालमनावर चांगले संस्कार व्हावेत या हेतूने आई – बाबांनी या पुस्तकाची निवड केली होती आणि त्याचा सकारात्मक परिणाम माझ्या वर्तणुकीवर झाला.

श्याम आणि त्याची आई यांच्यातील नात्याची सुंदर गुंफण, आईचे विचार, त्या विचारांचे श्यामवर झालेले संस्कार या सगळ्यांचे वर्णन पुस्तकातील प्रत्येक भागातून दिसून येते. हे पुस्तक अत्यंत सुरस आहे. साने गुरुजींनी त्यात जिव्हाळा ओतला आहे.

आईविषयीचे प्रेम, आदर, भक्ती कृतज्ञता इत्यादी भावना या पुस्तकातून व्यक्त झालेल्या दिसतात. यातील प्रत्येक कथा वाचून वाचकाच्या मनात भावनांचा काहूर माजतो. हृदयातील भावना डोळ्यांतील अश्रुंसोबत बाहेर पडतात. सत्य घटनांवर आधारित हे पुस्तक साने गुरुजींनी खूप कळकळीने लिहिले आहे.

‘आईने केलेले संस्कार’ हे या कथेचे मध्यवर्ती सूत्र आहे असे आपल्याला म्हणता येईल. या सर्व कथांमध्ये सुसंस्कृत, साध्या घरातील सरळ, सोपे आयुष्य जगणाऱ्या लोकांचे व त्यांच्या रम्य संस्कृतीचे वर्णन केलेले आढळते.

त्यातील श्यामच्या आईने वेळोवेळी आपल्या मुलाला जीवनातील मूलाधार असणाऱ्या संस्कारांची शिकवण कशाप्रकारे दिली, त्यासाठी जीवनानुभवातून नवी मूल्ये कशी रुजवली याचे वर्णन आढळते. साध्या, सरळ घटनेमागील सखोल विचारांची रुजवण श्यामच्या मनात कशी केली गेली याचे वर्णन करणाऱ्या कथा याच्या सौंदर्यात भर घालतात.

श्यामच्या पायाला माती लागू नये, म्हणून श्याम काळजी घेतोय, हे पाहून त्याच्या आईने त्याला दिलेला संदेश हा या पुस्तकातील मला सर्वाधिक आवडलेला भाग आहे. श्यामची आई म्हणते, की श्याम ज्याप्रमाणे पायाला धूळ लागू नये, म्हणून तू काळजी घेतोस, त्याप्रमाणे मनालाही धूळ लागू देऊ नकोस. अशा एक ना अनेक संस्कारांनी श्यामचे आयुष्य घडलेले दिसते.

या पुस्तकाच्या वाचनातून चांगल्या विचारांकडे वळण्याचा मार्ग दिसू लागला. माझ्या बऱ्याचशा चुका माझ्या लक्षात आल्या. माझ्या आईच्या वागण्यामागील कारणांचा मला शोध लागला. आईच्या मुलांवरील प्रेमाची जाणीवही झाली. या सर्व कारणांमुळे मला ‘श्यामची आई’ हे पुस्तक फार फार आवडले.

४. माझा आवडता नेता

भारत हा जागतिक पातळीवरील एक महत्त्वाचा देश समजला जातो. अनेक वर्षे पारतंत्र्यात घालवल्यावर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने साधलेली प्रगती विस्मयचकित करणारी आहे. पारतंत्र्याच्या जोखडातून भारताला मुक्त करण्यामागे अनेक नेते, क्रांतिकारक, देशप्रेमींचा हातभार होता. या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे, झुंजार लढ्यामुळे प्रसंगी प्राणार्पणामुळे भारत आज मोकळा श्वास घेत आहे. या कार्यात महात्मा गांधी, भगतसिंग, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बाबू गेनू, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा अनेकांचा त्याग महत्त्वपूर्ण आहे. यातील मला विशेष आवडणारा नेता म्हणजे लोकमान्य टिळक. त्यांची विचारसरणी, त्यांच्यातील जहालपणा माझ्या मनावर विशेष छाप पाडून जातो.

बाळ गंगाधर टिळक असे त्यांचे पूर्ण नाव असून, त्यांचा जन्म २२ जुलै १८५६ रोजी, तर त्यांचा मृत्यू १ ऑगस्ट १९२० मध्ये झाला. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे ते आदयप्रवर्तक असून अग्रगण्य राजकीय पुढारीही होते. ते गणितज्ञ, खगोलतज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक लेखक, वक्ते, स्वातंत्र्यसेनानी होते. ‘लोकमान्य’ ही त्यांना जनतेने दिलेली पदवी होती. लोकमान्य टिळक लहानपणापासून अत्यंत हुशार होते. त्यांची गणित विषयातील प्रगती उल्लेखनीय होती. त्यांच्या पुण्यातील वास्तव्याने त्यांच्या जीवनावर मोठा परिणाम घडवून आणला.

टिळकांना इंग्रजांचे अंधानुकरण करणाऱ्यांविषयी अत्यंत चीड होती. आपले विचार मांडण्यासाठी त्यांनी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही दोन वृत्तपत्रे सुरू केली व समाजप्रबोधनास प्रारंभ केला. आगरकरांशी झालेल्या मतभेदानंतर ‘केसरी’ चे संपादन त्यांनी स्वत:च्या हाती घेतले आणि त्यांचे अग्रलेख हा त्या वृत्तपत्राचा आत्मा बनला. भारतीय जनतेला घडणाऱ्या घटनांच्या निरपेक्ष अहवाल देणे हा केसरीचा मूळ उद्देश होता. या वृत्तपत्रांकडून त्यांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ अशा कठोर शब्दांत लेखन केले. त्यातून आपले परखड विचार त्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचवले.

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” यासारख्या वक्तव्यांतून इंग्रज सरकारची कानउघडणी केल्याचे प्रसंग त्यांचा करारीपणा दर्शवतात. ‘मंडाले’ च्या तुरुंगात असताना त्यांनी भगवतगीतेवर आधारित असणारे ‘गीतारहस्य’ नावाचे पुस्तक लिहिले. १९०३ मध्ये पसरलेल्या प्लेगच्या साथीत लोकमान्यांच्या घरातील बरीच मंडळी कालवश झाली. त्यानंतर पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी मुलांची जबाबदारी समर्थपणे पेलली.

समाजात वैचारिक क्रांती आणण्यासाठी त्यांनी बरेच नवे उपक्रम सुरू केले. लोकांनी संघटित व्हावे, एकत्र यावे, विचारांची देवाणघेवाण होऊन वैचारिक प्रबोधन व्हावे, या हेतूने त्यांनी ‘गणेशोत्सव’ व ‘शिवजयंती’ यांसारखे कार्यक्रम सार्वजनिकरीत्या साजरे करण्यास प्रारंभ केला. त्यातील मिरवणूक हा महत्त्वाचा भाग होता.

मंडालेच्या तुरुंगातून सुटल्यानंतर जेव्हा टिळक बाहेर पडले तेव्हा काँग्रेसमध्ये दुफळी माजली होती. त्यांनी प्रयत्न करूनही ते एकत्र येत नव्हते. अशावेळी त्यांनी ‘होमरुल लीगची’ स्थापना केली व त्यांना संघटित करण्याचे कार्य केले.

तत्कालीन तरुण पिढी लोकमान्यांच्या जहालमतवादी विचारांनी प्रेरित झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीच्या मार्गावर जहालमताने चालून लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळवणे हे त्यांचे ध्येय होते. इंग्रजांच्या अत्याचाराला, अन्यायाला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे हे त्यांचे विचार समाजमनात क्रांतीची लाट घेऊन येणारे होते.

अशा या आगळ्या-वेगळ्या नेत्याचे विचार मनाला प्रेरित करतात, म्हणून असामान्य प्रतिमेचे लोकमान्य टिळक मला खूप आवडतात.

Maharashtra Board Class 7 Marathi लेखन विभाग (रचना)

५. मी पाहिलेले निसर्गरम्य ठिकाण

‘श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे;
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.’

बालकवींच्या कवितेतील या ओळी नेहमीच मला आमच्या सहावीच्या वर्गाच्या वर्षासहलीचे स्मरण करून देतात. आजवर आई-बाबांसोबत बऱ्याच ठिकाणी फिरायला जाणे झाले. विविध प्रकारची निसर्गरम्य ठिकाणे, समुद्रकिनारे इत्यादी ठिकाणी निसर्गाचा यथेच्छ आनंद घेतला; मात्र मनावर विशेष छाप उमटवली ती इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत असताना, एका सुंदर ठिकाणाला दिलेल्या भेटीने. बालकवींनी वर्णन केल्याप्रमाणे श्रावणातील नवनिर्मितीचे सौंदर्य अनुभवास मिळाले ते या वर्षासहलीतच.

या वर्षी पाऊस जरा उशिराच आला होता; पण त्याने अगदी दमदार हजेरी लावली. झाडे-पाने सारीच सृष्टिसौंदर्यात न्हाऊन निघाली. अशातच श्रावणाचे आगमन म्हणजे पृथ्वीवरील सौंदर्याची परिसीमाच. अशा वातावरणात निसर्गाचे हे ओलेते रूप पाहण्याची संधी मागच्या वर्षी आमच्या शाळेकडून आम्हांला मिळाली. शाळेपासून २५ किमी. अंतरावर असणाऱ्या ‘झापडी’ धबधब्यावर गेलेली वर्षासहल म्हणजे माझ्या आयुष्यातील निसर्गसौंदर्याची मला मिळालेली अपूर्व मेजवानीच.

‘झापडी’ हे एका लहानशा आदिवासी पाड्याचे नाव; मात्र हे ठिकाण निसर्गसौंदर्याने नटलेले, सजलेले. त्यात उंचावरून कोसळणारा धबधबा, त्यातून वाहणारे पांढरेशुभ्र फेसाळलेले पाणी आणि आजूबाजूला असणारा वनराईचा विळखा. त्यातील श्रावणातीलं उभारून आलेले सौंदर्य म्हणजे निसर्गरम्य देखाव्याची पर्वणीच !

अशा वातावरणात आपल्या समवयस्क मित्रांबरोबर व शिक्षकांबरोबर जाणे म्हणजे आमच्यासाठी अत्यानंदाची गोष्ट होती.
पावसाच्या रिमझिम सरींचा आनंद आमच्यासह ती वृक्षराजी घेत होती. सर्वांनी धबधब्याच्या मंद प्रवाहात भिजण्याचा, उड्या मारण्याचा आनंद घेतला. आमचे शिक्षकही हा मोह आवरू शकले नाहीत. माझे मन मात्र ती वृक्षराजी पाहण्यात रमून गेले होते. नुकतीच अंघोळ करून बाहेर आलेल्या लहान बाळाच्या देखण्या रूपाप्रमाणे तो निसर्ग भासत होता आणि त्यातील तो रम्य धबधबा म्हणजे बाळाला लावलेले तिटच म्हणावे लागेल.

अशा या निसर्गसोहळ्याचा अपूर्व अनुभव घेत मी एका दगडावर बसून निरीक्षण करत असताना, मला अचानक एका सुंदर पक्ष्याचे दर्शन झाले. मोरपंखी रंगाच्या त्या पक्षाकडे पाहण्याचा मोह मला आवरला नाही. लक्षपूर्वक पाहिल्यावर तिथे दोन पक्षी असून, ते आपल्या अंड्यांची निगराणी करत असल्याचे लक्षात आले. त्यातील एक पक्षी आपल्या चोचीत कीटक पकडून तो दुसऱ्या पक्ष्याच्या चोचीत देत होता. बहुदा ती पक्षीण आपली अंडी सांभाळत असावी व त्यातील नर पक्षी तिच्या उदरनिर्वाहाची काळजी घेत असावा. असा हा रम्य देखावा पाहून या पक्ष्यांच्या कुंटुंबाविषयी, त्यांच्यातील नातेसंबंधांविषयी मनात कुतूहल निर्माण झाले. या

निसर्गसोहळ्याचा छान अनुभव बराच वेळ घेतल्यानंतर सरांनी सर्वांना निघायची सूचना दिली. या काळात ते पक्षी मला सरावलेले दिसले. माझ्या मनाला त्यांची एक वेगळीच ओढ लागली होती, त्यामुळे तेथून निघताना पावले जड झाली.

निसर्गाच्या सोहळ्याचा तो अनुभव आम्ही डोळ्यांत साठवून घेतला आणि परतीचा प्रवास सुरू झाला. त्या आठवणी मात्र मनाच्या कण्प्यात कायमच्या रुजल्या. तशी सहल पुन्हा पुन्हा जावी असे मनात आल्यावाचून राहत नाही. त्या निसर्गरम्य ठिकाणाची तुलना अन्य कोणत्याही ठिकाणाशी करणे केवळ अशक्यच. कधीतरी निवांत क्षणी या आठवणींमध्ये रमले तरीही मनाला आनंद मिळतो.

६. माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग

एकदा बाईंनी शाळेत निबंधासाठी विषय सांगितला ‘माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण.’ विषय ऐकताच मला एका प्रसंगाची आठवण झाली. त्यावेळी मी आणि माझा दादा असे आम्ही दोघे घरापासून काही अंतरावर असलेल्या शाळेत जात होतो.

त्या दिवशीही नेहमीप्रमाणे आम्ही दोघे सकाळी लवकर बसने शाळेत गेलो. येतानाही नेहमीच्या सवयीप्रमाणे बसस्टँडवर आलो. रोज एक-दीड तासांच्या अंतराने येणाऱ्या बस आज मात्र मोठ्या संख्येने स्टँडमध्ये उभ्या होत्या. एवढ्या बस आणि त्याही रिकाम्या पाहून आम्हां दोघांना खूप आनंद झाला. आम्ही सगळ्या बसमध्ये चढून उतरून मजा करत होतो; पण काही वेळाने परिस्थितीचे गांभीर्य दिसू लागले. कोणत्याही बसमध्ये चालक नव्हता. मग प्रश्न पडला, की एकही गाडी स्टँडमधून सुटत नाही. रिक्षांची, इतर गाड्यांची वर्दळ नाही. याचा अर्थ निश्चितच काहीतर घोटाळा झाला असावा.

दादाने मोठे असल्याची जबाबदारी पार पाडत स्टँडमधील नियंत्रकाला यासंदर्भात विचारले. त्यांच्याकडून समजले, की मार्गावर रास्तारोको आंदोलन सुरू होते, त्यामुळे गाड्या जायला मार्गच नव्हता. आता घरी कसे पोहोचणार या काळजीने आम्ही दोघेही रडू लागलो. दादाने स्वतःला सावरले व मला घेऊन नियंत्रणकक्षात बसला. त्यातच कळले, की फोनच्या लाईन्सही तोडल्या गेल्या होत्या. घरी संपर्क साधायला काही पर्यायच उरला नव्हता. या चिंतेत माझं रडू काही थांबत नव्हतं; पण तेवढ्यातच समोर बाबा दिसले आणि सारी चिंता मिटून गेली. डोळ्यांतील पाणी पुसत मी बाबांना घट्ट मिठी मारली. बाबांनीही आम्हां दोघांना जवळ घेतले. सर्वांत आधी त्यांनी आम्हांला खायला दिले. तोपर्यंत सूर्य मावळतीला आला होता.

स्टँडमधून बाहेर पडतानाच समोर आई दिसली. इकडे-तिकडे चारही बाजूंना ती आम्हांला शोधत होती. तिच्या डोळ्यांतील अश्रू पाहून आम्हीही रडणे थांबवू शकलो नाही. तिला जाऊन घट्ट मिठी मारली. तिघेही मनमोकळे होईपर्यंत रडत होतो.

आम्ही कुठे आहोत, कसे आहोत, सुखरूप आहोत ना? अशा अनेक प्रश्नांचा गुंता मनात घेऊन ती एवढे अंतर पायी चालत आली. संपर्काअभावी सगळ्यांचीच फरफट झाली..

त्यावेळी सुरू असणाऱ्या त्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने दगडफेक, जाळपोळ असे प्रकार घडले. अनेकजण यात जखमी झाले, त्यामुळे या परिस्थितीत आपली मुले कुठे असतील, त्यांना काही इजा झाली नसेल ना, या भीतीने आईने स्वतःची पर्वा न करता एवढे अंतर पायी चालून ती आम्हा मुलांपर्यंत पोहोचली. त्यावेळच्या त्या आम्हा सर्वांच्या भेटीचा तो सोहळा अवर्णनीयच होता.

या परिस्थितीत आम्ही चौघेही घरी जाण्यास निघालो. अजूनही आंदोलन सुरू असल्याने रस्ते बंदच होते; त्यामुळे १५ किमीचे अंतर पुन्हा पायी जावे लागले; पण त्या आनंदाच्या भरात अंतर कधी संपले ते कळलेच नाही. त्यात आईने आणि बाबांनीही आमचे थकलेले चेहरे पाहून उदया शाळेत नाही गेलात तरी चालेल, असे म्हटल्यावर तर आमच्या आनंदाला पारावारच उरला नाही !

सरावासाठी प्रश्न

प्रश्न १.
खालील विषयांवर निबंधलेखन करा.

  1. रंग नसते, तर …
  2. माझी पहिली स्पर्धा, मी पाहिलेली यात्रा
  3. माझी शाळा

२. पत्रलेखन

या इयत्तेत आभारपत्र व अभिनंदन पत्र असे पत्रलेखनाचे दोन प्रकार आपण अभ्यासणार आहोत. खालील पत्रे अभ्यासा.

आभारपत्र

प्रश्न १.
तुम्ही स्पर्धापरीक्षेत यशस्वी झाला आहात. परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आभार मानणारे पत्र लिहा.
उत्तर:

राखी जगदाळे
५२१, रमाई चाळ,
माहुलगाव,
मुंबई – ४०० ०२५.
दि. १२ जून २०१७.

प्रति,
श्री. राजे सर
लोकमान्य विदयालय,
दादर (पूर्व), मुंबई – ४०० ०१४.

विषयः परीक्षेसाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभारपत्र.

प्रिय राजे सर,
सादर नमस्कार.

कालच माझा एम्. पी. एस्. सी. परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत राज्यात पंधरावा क्रमांक पटकावला आहे आणि यांचे संपूर्ण श्रेय तुम्हांलाच जाते. सर, तुम्ही मला योग्य वेळी मार्गदर्शन केले नसते, तर मी चुकीच्या मार्गाने गेले असते.

मी दहावीत असताना तुम्ही आमचे वर्गशिक्षक म्हणून आलात. सुरुवातीला अभ्यासाची सवय आणि आवड दोन्ही नसल्यामुळे मी तुम्हांला घाबरून असायचे. माझी अभ्यासातली प्रगती जेमतेम होती हे तुम्ही जाणत होताच; पण शाळेत झालेल्या प्रश्नमंजुषेतील माझ्या सहभागानंतर तुम्ही मलाच माझी भेट घालून दिलीत. माझ्यातील, स्पर्धापरीक्षेत चांगली कामगिरी करू शकण्याचा गुण हेरून तुम्ही मला त्या दिशेने मार्गदर्शन दिलेत त्याबद्दल मनापासून आभार.

त्यानंतरच्या प्रत्येक सुट्टीत तुम्ही स्पर्धापरीक्षांची पुस्तके वाचायला दिलीत, ग्रंथालयात माझे खाते उघडून दिलेत, त्यामुळे माझे वाचन वाढले व त्याचा परिणाम म्हणून आज मी हे यश मिळवले. तुम्ही जी मदत, जे प्रोत्साहन मला आजवर दिलेत त्याच्या बळावरच मी हे यश संपादन करू शकले. सर, आपले आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत; पण सदैव आपल्या ऋणांत राहायला मला आवडेल.

सर, लवकरच शाळेत येऊन तुम्हांला भेटेन.

तुमची नम्र विद्यार्थिनी,
राखी जगदाळे

Maharashtra Board Class 7 Marathi लेखन विभाग (रचना) 1

Maharashtra Board Class 7 Marathi लेखन विभाग (रचना)

प्रश्न २.
साहित्यसंमेलनाची प्रवेशिका मिळवून दिल्याबद्दल गावातील साहित्यप्रेमी व्यक्तीचे आभार मानणारे पत्र लिहा.
उत्तरः

समीक्षा देवरे
३०५, राणे निवास,
एम्. जी. रोड,
पनवेल – ४१० २०६.
दि. १ जानेवारी २०१७.

प्रति,
माननीय श्री. रामेश्वर पाटील,
२०१, देव निवास,
सवाई रोड, विचुंभे,
पनवेल, ४१० २०६

विषय: साहित्यसंमेलनाच्या प्रवेशपत्रिकांबद्दल आभारपत्र.

सन्माननीय महोदय,
स.न.वि.वि.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आगरी साहित्यसंमेलन पनवेलमध्ये भरवण्यात आले. साहित्याची आवड असणाऱ्या आम्हां विदयार्थ्यांसाठी हे साहित्यसंमेलन म्हणजे पर्वणीच. आमची तिकडे जाण्याची व त्यात सहभागी होण्याची तीव्र इच्छा असतानाही संमेलनाच्या प्रवेशिका संपल्याने आम्हांला या संमेलनास मुकावे लागणार होते; परंतु आम्हा तरुणांचा साहित्यातील रस बघता तुम्ही तत्काळ आम्हांस प्रवेशिका उपलब्ध करून दिल्यात त्याबद्दल तुमचे मन:पूर्वक आभार. कोणत्याही स्वरूपाची ओळख नसताना केवळ साहित्यसेवा म्हणून तुम्ही केलेली ही मदत एक खरा साहित्यप्रेमीच करू शकतो.

पुन्हा एकदा मी आपले आभार मानते. धन्यवाद.

आपली नम्र,
समीक्षा देव

Maharashtra Board Class 7 Marathi लेखन विभाग (रचना) 2

अभिनंदन पत्र

प्रश्न १.
मोठ्या भावाला प्राध्यापक म्हणून नोकरी लागल्याने त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
उत्तरः

गार्गी पाटील
३०४, पाटील निवास
जे. पी. रोड, रामवाडी
पेण- ४०२ १०७.
दि. १० ऑक्टोबर २०१७.

तीर्थस्वरूप दादास,
स.न.वि.वि.

कालच मोठ्या ताईचं पत्र मिळालं. तुला प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाल्याचे कळले. दादा, तुझे खूप खूप अभिनंदन ! घरात सगळ्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. तुझी इच्छा पूर्ण झाल्याने आई-बाबाही खूप खूश आहेत.

तुला लहानपणापासून शिक्षक बनण्याची आवड होती हे सर्वांनाच माहीत होते. आई जेव्हा शाळेत शिकवायला जात असे तेव्हा तू तिच्यासोबतृ जायचास आणि ती वर्गात नसताना तू मुलांना शिकवायचास. त्यातूनच तुझी ही आवड वृद्धिंगत होत गेली. परिणामी, उच्च शिक्षण घेतल्यानंतरही याच क्षेत्रात काम करायची तुझी आवड टिकून राहिली. तुझ्या मनाप्रमाणे, तुझ्या आवडीची नोकरी मिळाल्याने तू नक्कीच खूश असणार.

पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप-खूप शुभेच्छा आणि आई बाबांकडून आशीर्वाद. पत्र मिळताच त्याचे उत्तर पाठवायला विसरू नकोस. वेळ मिळेल तेव्हा घरी ये. तुला भेटायची आतुरता लागली आहे.

तुझी लाडकी,
गार्गी

Maharashtra Board Class 7 Marathi लेखन विभाग (रचना) 3

प्रश्न २.
तुमच्या मैत्रिणीची निवड राष्ट्रीय खो-खो संघात झाल्याने तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
उत्तरः

रागिणी जरे,
२१, कोंदण निवास,
सुवर्ण रोड, मुंबई – ४०००२१.
दि. ४ मार्च २०१७.

प्रिय अदिती,
सप्रेम नमस्कार.

अदिती, काल पेपरमध्ये तुझे नाव पाहिले आणि खूप आनंद झाला. खो – खो च्या राष्ट्रीय संघात तुझी निवड झाली त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन. तुझ्या प्रचंड मेहनतीचे फळ तुला मिळाले.

लहानपणी शाळेत खो-खो खेळताना, तुझा खेळ पाहण्यासाठी सारे शिक्षक आणि सगळी शाळा जमा होत असे. तुझी चपळता, धावण्याचा वेग आणि सापळा रचण्याचे तंत्र यामुळे तू ज्या संघात असायचीस तो संघ विजयी होणं निश्चित असायचे. तू सतत सराव करायचीस म्हणून आज एवढ्या मोठ्या स्तरावर पोहोचू शकलीस. शाळा-कॉलेजचा अभ्यास सांभाळून खेळाचा सराव करताना तुझी होणारी धावपळ आम्ही सर्वांनीच पाहिली आहे.

तुझ्या मेहनतीचे आज चीज झाले आहे. तुझ्या घरातही सर्वांनाच खूप आनंद झाला असेल ना! काका – काकूंची मान तर अभिमानाने उंच केलीस तू. मलाही तुझा खूप अभिमान वाटतो गं !

येणाऱ्या सामन्यांसाठी खूप मेहनत घे आणि यशस्वी हो याच शुभेच्छा. या सगळ्यांतून वेळ मिळाल्यास पत्राचे उत्तर पाठव.

तुझी मैत्रीण,
रागिणी जरे

Maharashtra Board Class 7 Marathi लेखन विभाग (रचना) 4

सरावासाठी प्रश्न

प्रश्न १.
खालील विषयांवर पत्रलेखन करा.

  1. गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मदत केल्याने एक विदयार्थी प्रतिनिधी म्हणून त्यांचे आभार मानणारे पत्र लिहा.
  2. तुमच्या बाबांना नोकरीत बढती मिळाली. त्यांच्या अभिनंदनासाठी पत्र लिहा.

३. प्रश्नावली निर्मिती

लेखन विभागात, मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करणे हा लेखनप्रकारही समाविष्ट आहे. यात एखादया क्षेत्रातील व्यक्तीच्या मुलाखतीसाठी प्रश्न तयार करायचे असतात. व्यक्तीकडून सविस्तर माहिती प्राप्त करता येईल यादृष्टीने प्रश्न तयार करावेत. खालील प्रश्नावली अभ्यासा.

प्रश्न १.
साहित्यविश्वातील एका ज्येष्ठ लेखकाने शाळेला भेट दिली असता, त्यांच्या मुलाखतीकरता प्रश्नावली तयार करा. प्रश्नावली १

  1. तुमचे संपूर्ण नाव काय? तुम्ही कोणकोणत्या टोपण नावांनी लेखन करता?
  2. तुम्ही कोणकोणते साहित्यप्रकार हाताळले आहेत?
  3. त्यातील तुमचा आवडता साहित्यप्रकार कोणता व का?
  4. तुमचे पहिले लिखाण कधी केले? लेखनाची आवड कशी जोपासलीत?
  5. तुम्ही लिहिलेल्या पुस्तकांची नावे सांगा. त्यातील तुमचे आवडते पुस्तक कोणते ?
  6. आतापर्यंत तुम्हांला कोणकोणते पुरस्कार मिळाले? कोणत्या साहित्यासाठी मिळाले?
  7. तुमच्या नव्याने येणाऱ्या साहित्यकृतींविषयी थोडी माहिती मिळेल का?
  8. तुमचा आवडता लेखक/लेखिका कोण? त्यांचे कोणते लेखन तुम्हांला सर्वाधिक आवडते?
  9. तुमचे साहित्याविषयीचे मत सांगा.
  10. नवोदित लेखकांसाठी काही विशेष सूचना आहेत का ?

प्रश्न २.
तुमच्या शाळेतील माजी विदयार्थी आय. एफ. एस. ऑफिसर झाला आहे. त्याच्या मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करा.

प्रश्नावली २

  1. तुमचे संपूर्ण नाव आणि शिक्षण सांगा..
  2. तुमचे शिक्षण कोणकोणत्या ठिकाणी, शाळांमध्ये झाले?
  3. आय. एफ. एस. व्हायचे केव्हा निश्चित केलेत?
  4. याकरता कोणते विशेष प्रयत्न करावे लागले?
  5. स्पर्धापरीक्षांचा अभ्यास कसा केलात? त्याकरता कोणती पुस्तके वापरलीत?
  6. आतापर्यंतचे तुमचे आवडते पुस्तक कोणते ?
  7. या यशाचे श्रेय तुम्ही कोणाला दयाल ?
  8. या मार्गात तुम्हाला कोणाकोणाचे सहकार्य लाभले ?
  9. अभ्यासाचे नियोजन कसे केलेत? त्याकरता काय प्रयत्न केलेत?
  10. स्पर्धापरीक्षांच्या विदयार्थ्यांसाठी काही मोलाचे शब्द सांगा.

सरावासाठी प्रश्न

प्रश्न १.
दिलेल्या विषयाच्या आधारे प्रश्नावली तयार करा.

  1. शाळेतील आदर्श विदयार्थी म्हणून निवड झालेल्या मुलाच्या मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करा.
  2. तुमच्या विभागाचे खासदार नागरिकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करा.

Maharashtra Board Class 7 Marathi लेखन विभाग (रचना)

४. संवादलेखन

संवादलेखन हा लेखन प्रकारातील एक कल्पक व मजेशीर प्रकार आहे. यामध्ये एखादा विषय दिला जातो. त्या विषयावर आधारित दोन व्यक्तींमधील संवादाची कल्पना करून हे प्रश्न सोडवावे लागतात. खालील संवाद अभ्यासा.

प्रश्न १.
तुम्हांला एक शेतकरी भेटला आहे व त्याच्याशी तुमचा संवाद झाला आहे अशी कल्पना करून संवादलेखन करा.
(एस्.टी. मध्ये प्रवास करताना बाजूला शेतकरी बसला आहे.)

मी : नमस्कार.
शेतकरी : रामराम!
मी : आपण मुळचे इथलेच का?
शेतकरी : हो तर ! आम्ही या मातीची मानसं इथंच जन्मनार आनि इथंच मरनार. तुम्ही कुठचं ?
मी : मी मुंबईतला. इकडे आजोळी आलोय. सुट्टीच्या काळात आजीला भेटण्यासाठी.
शेतकरी : वा वा! छान ! आजीला भेटायला आला ते बरं केलंत. नाहीतर गावाकडं कोन येतंय? आजकालची पोरं तर गावाकडं बघत पन नाय.
मी : तुम्ही पोटापाण्यासाठी काय करता का ? कधी शहरात येता का ?
शेतकरी : आहो, मी शेतकरी हाये. आमचं जीवन म्हणजे ही माती. या शेतात, या पिकांमध्येच आमचं आयुष्य पाहतो आम्ही. यांना
सोडून शहरात येऊन काय करनार ?
मी : तुमच्या शेतात पिकवलं जाणारं धान्य तुम्ही कुठे विकता ?
शेतकरी : आमचं हातावरचं पोट. कधी पाऊस – पानी चांगलं झालं, तर तालुक्याच्या गावी दलालाला विकतो. पन कवडीमोलानं पिकं
जातात ओ.
मी : मग तुम्ही ही पिकं दलालाशिवाय थेट बाजारात का आणत नाही.
शेतकरी : इतकं सोपं नाही ते. यामागे खूप कारणं हायेत. प्रयत्न चालू हायेत, पण आधाराची गरज हाये.
मी : मला आवडेल तुम्हांला मदत करायला. तुमच्यामुळेच आम्ही शहरात बसून पोटभर जेवतो हे नाही विसरणार आम्ही.
शेतकरी : खरं, चला आता! निघतो मी. शेतीसाठी खतं आनायला चाललोय.
मी : बरं. काही लागलं तर जरूर सांगा. भेटूच…
(दोघेही आपापल्या दिशेने निघून जातात.)

प्रश्न २.
तुम्हांला लहानपणी शिकवणारे शिक्षक अचानक भेटले आहेत व त्यांच्याशी झालेल्या संवादाची कल्पना करा व लिहा.
(तालुक्याच्या गावी एका पुस्तक प्रदर्शनात पूर्वी शिकवणारे सर अचानक समोर आले.)
मी : नमस्कार! सर
सर : नमस्कार!
मी : सर, ओळखलंत का मला? तुम्ही भायखळ्याला सरस्वती विद्यामंदिर शाळेत शिकवायचात. मी तिसरी ‘क’ चा विदयार्थी होतो.
सर : अरे ! रमेश तू होय रे. अरे, तुला मी ओळखलंच नाही. किती रे मोठा झालास तू ! उंची किती वाढली तुझी !
मी : होना सर. किती दिवसांनी भेटतोय आपण. तिसरीत आमचे वर्गशिक्षक म्हणून आलात आणि शाळेविषयी आवड निर्माण . झाली; पण तुमच्या अचानक झालेल्या बदलीने आम्हांला धक्काच दिला.
सर : अरे माझ्यासाठीही ती अनपेक्षित घटना होती. अचानक सुट्टीच्या काळातच बदली झाल्याने माझाही गोंधळ झाला.
मी : सर, पण आम्हांला भेटायलाही नाही आलात तुम्ही.
सर बाळा, दूरच्या शाळेत बदली झाल्याने मला तिथे येणं नाही जमलं. बरं. ते जाऊ दे. तू सांग, आता काय करतोस? कोणत्या शाळेत जातोस ?
मी : सर, आता मी सातवीत आहे. तालुक्याच्या गावी राहतो. तिथल्याच शारदा विदयालयात जातो. सर या वेळच्या शिष्यवृत्ती परीक्षेचाही अर्ज मी भरला आहे. चौथीलाही मी शिष्यवृत्ती मिळवली होती.
सर : अरे वा! शाब्बास! मला तुझा खूप अभिमान वाटतो. अशीच प्रगती करत राहा. मीही बाजूच्याच शाळेत आहे. काहीही अडचण आली, तर खुशाल माझ्याकडे ये.
मी : धन्यवाद सर ! तुमचे मार्गदर्शन सोबत असेल, तर मला कशाचीही भीती बाळगायची गरज नाही.
सर : बरं. तुझे बाकीचे मित्र कुठे आहेत?
मी : सर, सगळे गावीच शाळेत आहेत. माझ्या बाबांची बदली इकडे झाल्याने मी एकटा येथे आलो. गावातील सगळी मंडळीही तुमची आठवण काढतात.
सर : अरे, दहा वर्षे मी त्या शाळेत काम केलं आहे, त्यामुळे माझंही सर्वांशी एक नातं जुळलं आहे. मला वेळ मिळाला, की मी नक्की गावी जाईन आणि सर्वांना भेटेन.
मी : सगळेच खूप खूश होतील सर.
सर : बरं, आता अभ्यासाकडे छान लक्ष दे. भावी आयुष्यासाठी तुला शुभेच्छा.
मी : धन्यवाद सर. भेटू पुन्हा कधीतरी.
(दोघेही आपापल्या मार्गाने निघून जातात.)

सरावासाठी प्रश्न

प्रश्न १.
खालील विषयावर संवादलेखन करा.

  1. तुम्ही एका भाजीवाल्याशी संवाद साधत आहात अशी कल्पना करा आणि ते संवादरूपात लिहा.
  2. तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरशी संवाद साधत आहात. संवादलेखन करा.

५. जाहिरातीवरून प्रश्नोत्तरे

या लेखन प्रकारात विशिष्ट उत्पादनाची जाहिरात दिली जाते. या जाहिरातीवर आधारित काही प्रश्न विचारले जातात. दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. त्याचे नीट आकलन करून घ्यावे, त्यामुळे प्रश्नांची उत्तरे सहजपणे लिहिता येतील. जाहिराती व त्यांवर आधारित प्रश्नोत्तरे अभ्यासा.

प्रश्न १.
Maharashtra Board Class 7 Marathi लेखन विभाग (रचना) 5
वरील जाहिरात वाचा. त्याआधारे खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. दुकानाचे नाव काय आहे?
  2. जाहिरात कशा संदर्भात आहे?
  3. दुकानाची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
  4. दुकानाचा शुभारंभ कधी होणार आहे?
  5. दुकानाचे ठिकाण कोणते आहे ?
  6. खरेदीवर कोणती सवलत देण्यात आली आहे ?

उत्तर:

  1. दुकानाचे नाव ‘इंद्रधनू’ आहे.
  2. जाहिरात छत्र्यांच्या दुकानातील छत्री विक्रीसंदर्भात आहे.
  3. या दुकानात विविधरंगी छत्र्या उपलब्ध आहेत, तसेच हव्या त्या प्रकारचा छापही या छत्र्यांवर बनवून मिळू शकतो. येथे डबल, ट्रिपल फोल्डच्या, तसेच लहान मुलांसाठी विशेष छत्र्याही उपलब्ध आहेत. याशिवाय, या दुकानात रेनकोटही आहेत.
    दोन छत्र्यांच्या खरेदीवर २०% सवलत !
  4. दुकानाचा शुभारंभ दि. १३ जून २०१७ रोजी होणार आहे.
  5. दुकान आर. के. रोड, दादर, मुंबई या ठिकाणी आहे.
  6. या दुकानात दोन छत्र्यांच्या खरेदीवर २०% सवलत देण्यात आली आहे.

Maharashtra Board Class 7 Marathi लेखन विभाग (रचना)

प्रश्न २.
Maharashtra Board Class 7 Marathi लेखन विभाग (रचना) 6
वरील जाहिरात वाचा. त्याआधारे खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. जाहिरात कशासंदर्भात आहे ?
  2. दुकानाचे नाव काय आहे?
  3. दुकान कोठे उघडणार आहे?
  4. दुकानाचा शुभारंभ कधी आहे?
  5. दुकानाची वैशिष्ट्ये कोणती?
  6. या दुकानात कोणती विशेष सवलत देण्यात आली आहे?

उत्तर:

  1. ही जाहिरात एका सुवर्णपेढीतील दागिन्यांच्या प्रदर्शनासंदर्भात आहे.
  2. दुकानाचे नाव ‘लावण्य’ आहे.
  3. दुकान गाळा क्र. ६४, समर्थ नगर, भांडुप, मुंबई – ४०० ०२५ येथे उघडणार आहे.
  4. दि. ४ एप्रिल २०१७ रोजी दुकानाचा शुभारंभ आहे.
  5. या दुकानात पारंपरिक, तसेच नव्या पद्धतीचे दागिने आहेत. मोत्यांचे दागिने येथे बनवून मिळतील. दागिन्यांची चार वर्षांची वॉरंटी असून लग्नासाठीचे विशेष कलेक्शनही येथे आहे, तसेच आंतरराष्ट्रीय डिझाइन्सही येथे उपलब्ध आहेत.
  6. या दुकानात दागिन्यांची ऑर्डर दिल्यास त्यांच्या घडणावळीवर ५% सवलत देण्यात आली आहे.

सरावासाठी प्रश्न

प्रश्न १.
Maharashtra Board Class 7 Marathi लेखन विभाग (रचना) 7
वरील जाहिरात वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. जाहिरात कशासंदर्भात आहे ?
  2. उत्पादनाची वैशिष्ट्ये कोणती?
  3. उत्पादनावर विशेष सवलत कोणती?
  4. पुढील उत्पादन कोठे उपलब्ध होईल?
  5. पुढील टूथपेस्ट आरोग्यदृष्ट्या फायदेशीर का आहे?

Leave a Comment